आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील 

पनवेल दि.२५ (संजय कदम) : जरी सगळे नेते सोडून गेले तरी कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना कधी नव्हे एवढा उत्स्फूर्त पाठिंबा जनता देईल असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीवेळी ते बोलत होते. 
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व  राहिले. सभापतिपदी महाविकास आघाडीचे नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्त नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचे अभिनंदन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील पनवेलला आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आगामी काळात उद्धव ठाकरेंना कधी नव्हे एवढा उत्स्फूर्त पाठिंबा जनता देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, मा आ बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख व मा आ मनोहरशेठ भोईर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना भाई जयंत पाटील यांनी सांगितले कि, विशिष्ट तत्वाने, विशिष्ट ध्येयाने बाळगून जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जरी सगळे नेते सोडून गेले तरी कार्यकर्ते मात्र ठामपणे आमच्या पाठीशी आहेत. म्हणूनच आम्ही पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवू शकलो. अशाचप्रकारे आपण एकत्रितपणे पुढील सर्व निवडणूका लढल्यास रायगड जिल्हात दोन खासदार व सात आमदार हे महाविकास आघाडीचेच असतील यात तिळमात्र शंका नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो : नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देताना मान्यवर
Comments