पनवेल / प्रतिनिधी,( दि १३ )रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवत जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे. पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ८ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले असून या विजयामुळे रायगड जिल्हा परिषदेत प्रथमच भारतीय जनता पक्ष निर्णायक भूमिकेत आला आहे. परिणामी जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला असून जिल्ह्याच्या राजकारणात हा मोठा आणि ऐतिहासिक बदल मानला जात आहे. या बदलामुळे भविष्यात रायगड जिल्हा परिषदेत भाजपची राजकीय समीकरणे अधिक मजबूत होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर पनवेल पंचायत समितीमध्येही भाजपने प्रथमच सत्ता मिळवली आहे. पनवेल पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे.