कळंबोली वसाहत आमचा बालेकिल्ला आहे आणि या निवडणुकीत देखील बालेकिल्लाच राहणार - शेकाप चे प म पा नगरसेवक रविंद्र भगत
शेकाप चे प म पा नगरसेवक रविंद्र भगत..

पनवेल / वार्ताहर :
       
३३ मावळ लोकसभा मतदार संघामध्ये विद्यमान खासदारांच्या विरोधात असलेले वातावरण चांगलेच तापले आहे. नुकताच पनवेल कळंबोली मधील गुरुद्वाराचे प्रधान यांनी संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकल मराठा समाजाने महायुतीने फसवल्यामुळे मनातील खदखद व्यक्त करत महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धडधड नक्कीच वाढलेली असणार. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असणाऱ्या कळंबोली विभागातील नगरसेवक रवींद्र भगत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ठाम पणाने आपली भूमिका मांडली.
        रवींद्र भगत म्हणाले की कळंबोली वसाहत ही सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेली आहे. महानगरपालिकेमध्ये ही वसाहत अंतर्भूत होण्यापूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीवर लालबावटा डौलाने फडकत होता. अशातच काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व मित्रपक्ष आमच्या सोबत असल्याने महाविकास आघाडीची वज्रमूठ प्रस्थापितांना दणका देण्यासाठी सज्ज झाली आहे.विद्यमान खासदारांनी कळंबोली वसाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा घणघात रवींद्र भगत यांनी केला. ते म्हणाले की कळंबोली विभागात आमचे असलेले प्राबल्य पाहता सत्ताधाऱ्यांनी कळंबोली मध्ये ढुंकून देखील पाहिलेले नाही.
          मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जेथून सुरू होतो ती ही कळंबोली वसाहत. आशिया खंडातील सगळ्यात मोठे लोखंड व पोलाद बाजार आवार या वसाहती मध्ये आहे. या ठिकाणी असणारे स्टील मार्केट व अन्य गोदामे यामध्ये काम करणारा फार मोठा कामगार वर्ग कळंबोली वसाहतीमध्ये राहतो. मूळ कळंबोली गाव, कष्टकरी व मध्यम उत्पन्न गटातील नागरिक, आणि उच्चभ्रु नागरिक असे संमिश्र जन जिवन याठिकाणी गुण्या गोविंदाने राहत असले तरी त्यांच्या देखील अनेक प्रलंबित समस्या आहेत. सत्तेमध्ये असो अगर नसो आम्ही नेहमीच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी खंबीरपणे उभे असतो. 
          आज २८ व्या लोकसभेच्या निवडणुकीकरता ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातून आमचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी मतांचा जोगवा मागत असताना विद्यमान खासदारांच्या प्रति जनता नाराज असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आम्ही मात्र सातत्याने जनताभिमुख काम करत असल्यामुळे कळंबोली वासियांची मते संजोग वाघेरे पाटील यांनाच मिळतील असा मला ठाम विश्वास आहे. संजोग वाघेरे पाटील यांची निशाणी असणारी मशाल घरोघरी पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत.कळंबोली वसाहत आमचा बालेकिल्ला आहे आणि या निवडणुकीत देखील बालेकिल्लाच राहणार असे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत म्हणाले.
Comments