आदई, नेवाळी गावचा पाणीप्रश्‍न सुटणार..


सरपंच रमाकांत गरुडे यांच्या अथक प्रयत्नांना यश
पनवेल/प्रतिनिधी
नवीन पनवेलला लागूनच असलेल्या आदई गावामध्ये नागरिकीकरण झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे आदई व नेवाळी या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. भविष्यात होणारी बांधकामे आणि त्यामुळे पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीची होणारी दमछाक  ही बाब सरपंच रमाकांत गरुडे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे याचा पाठपुरावा केला. जवळपास दोन वर्षांपासून सरपंच रमाकांत गरुडे जलमीशन अंतर्गत निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जलजीवन मिशन अंतर्गत आदई नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 5.23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच आदई व नेवाळी गावचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे. साधारणत महिनाभरात या कामाला सुरुवात होईल असे सरपंच रमाकांत गरुडे यांनी सांगितले.

जलजीवन मिशन अंतर्गत योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेकरीता परिषदेने नियुक्त केलेल्या यश इंजिनिअर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. मार्फत आदई नळ पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून सदर योजना ही 5 कोटी रुपयांच्या वरील असल्या कारणाने ती पुढील कार्यवाही करीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याबाबतही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
Comments