नवीन पनवेल, ता.29 (वार्ताहर) अतिवृष्टीमुळे कळंबोली वसाहतीमधील अल्प उत्पादन गटातील नागरिक राहत असलेल्या सोसायट्यांची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणच्या नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.येथील सांड पाणी वाहून नेणार्या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओसंडून वहात आहेत.याची तक्रार करून सुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विजय खानावकर आक्रमक झाले होते व रहिवाशांच्या सह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकारी सहारे यांना सोसायटी मध्ये घेवून समस्यांचा पाढाच सिडको अधिकार्या समोर मांडला.
सिडकोला फैलावर घेताच कामे दोन दिवसात मार्गी लावू असे अश्वासन सिडकोचे अधिकार्यांनी दिले आहे. सांड पाण्याच्या टाक्या परिसरात वाहत असल्याने अतिशय दुर्गंधी पसरलेली होती. त्यावर घोंगावणार्या माशा आणि 24 तास वाहणारे सांडपाणी यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हेच पाणी पिण्याच्या पाण्यात देखील मिसळते त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. याशिवाय येथील चेंबर वरची झाकणे नाहीशी झाली आहेत,पदपथ अपूर्ण अवस्थेत आहेत.
प्रदीप स्पोर्टस ते राजे शिवाजी नगर रस्ता डागडुजी करणे व नवीन रस्त्याचे डांबरीकरण करणे, राजे शिवाजी नगर, राम मंदिर, प्रदीप स्पोर्ट्स. सेक्टर 1 या परिसरामध्ये दूषित पाणी येत होते शुद्ध पाणी यावे किंवा नवीन पाईपलाईनटाकून देणे, राम मंदिर ते तुळजाभवानी मंदिर या मार्गावरील परिसरामध्ये पावसाचे पाणी व सांडपाणी साठत होते येथे गटाराचे नियोजन करून , गटारातून पाण्याचा तात्पुरता निचरा करणे व काही दिवसांनी नवीन गटारी तयार करून देणे अशी कामे निवेदनाद्वारे सिडको अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहेत.या साठी सिडको अधिकार्याकडून दोन दिवसात जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे अश्वासन देण्यात आले आहे.