किरकोळ घरगुती अपघाताने ओढवले मोठे संकट ; डॉक्टरांनी वाचवला ३१ वर्षीय तरुणाचा पाय
चार तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने रुग्णावर यशस्वी उपचार
नवी मुंबई /पनवेल वैभव - : घरातील एक साधा अपघात 31 वर्षीय तरुणासाठी आयुष्य बदलणारा ठरला. घरातील काचेच्या शेल्फला पाय आदळल्यानंतर शेल्फचा काच तुटून त्याचे तुकडे पायात खोलवर घुसले. या अपघातात त्याच्या पायातील अकिलीस टेंडन (Achilles Tendon), पाच महत्त्वाचे स्नायू, दोन मज्जातंतू आणि एक प्रमुख धमनी पूर्णपणे कापली गेली. त्यामुळे त्याच्या चालण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, मेडिकव्हर हॉस्पिटलमधील प्लास्टिक ॲण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. अतीव सिंग यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचा पाय वाचवला आणि त्याला पुन्हा स्वतंत्रपणे चालण्याची संधी मिळवून दिली.
नवी मुंबईतील रहिवासी श्री. नमन कुमार (नाव बदललेले)यांचा 23 जुलै रोजी हा अपघात झाला. काचेच्या शेल्फला धडक लागताच ती तुटली आणि काचेचे धारदार तुकडे त्यांच्या पायात खोलवर घुसले. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव आणि असह्य वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला ही साधी जखम वाटत असली तरी प्रत्यक्षात ती अत्यंत गंभीर स्वरूपाची होती. त्यांना तातडीने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे आपत्कालीन विभागाने रक्तस्राव नियंत्रणात आणून रुग्णाची प्रकृती स्थिर केली.
याबाबत माहिती देताना मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. अतीव सिंग म्हणाले, एमआरआय आणि सीटी अँजिओग्राफीसह सविस्तर तपासणीत दुखापतीची तीव्रता स्पष्ट झाली. या अपघातात अकिलीस टेंडन( हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायुबंध असते जे पायाच्या भागात असते)पूर्णपणे तुटले होते. तसेच फ्लेक्सर हॅल्युसिस लॉन्गस, पेरोनियस ब्रेव्हिस, पेरोनियस लॉन्गस, फ्लेक्सर डिजिटोरम लॉन्गस आणि टिबियालिस पोस्टेरियर हे पाच महत्त्वाचे स्नायू, मज्जातंतू तसेच पायाला रक्तपुरवठा करणारी पोस्टेरियर टिबियल धमनी पूर्णपणे कापली गेली होती. काचेमुळे झालेल्या जखमा वरवर लहान दिसल्या तरी आतून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असू शकते. अशा परिस्थितीत वेळीच उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. आमचे उद्दिष्ट केवळ पाय वाचवणे नव्हते, तर त्याची हालचाल, संवेदना, रक्तपुरवठा आणि रुग्णाची स्वतंत्र जीवनशैली पुन्हा पूर्ववत करणे हे होते.
दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे चार तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या टीमने तुटलेला अकिलीस टेंडन दुरुस्त केला, पाचही स्नायू पुन्हा जोडले, पोस्टेरियर टिबियल आर्टरीची पुनर्बांधणी करून रक्तपुरवठा सुरळीत केला आणि टिबियल व सुरल मज्जातंतूंची सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे दुरुस्ती केली.
डॉ. सिंग पुढे म्हणाले, शस्त्रक्रियेदरम्यान विशेष वाढीव दृश्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जखमेची तपासणी करण्यात आली. रक्ताभिसरण पुन्हा सुरू करण्याबरोबरच पायाच्या हालचालींसाठी आवश्यक असलेले स्नायू, स्नायुबंध आणि मज्जातंतू यांची काळजीपूर्वक पुनर्बांधणी करण्यात आली. ही सर्व संरचना चालताना पाय पुढे ढकलण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून रुग्णाची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून पुढील काही महिन्यांत फिजिओथेरपी आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून हळूहळू हाडांना बळकटी, हालचाल आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवता येतो.
ते पुढे म्हणाले, अशा शस्त्रक्रियांचे यश केवळ शस्त्रक्रियेवर अवलंबून न राहता वेळीच वैद्यकीय मदत आणि त्यानंतरचे पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे असते. काचेमुळे झालेल्या खोल जखमांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. टेंडन, मज्जातंतू, धमनी किंवा स्नायूंना इजा झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यास कायमस्वरूपी अपंगत्व टाळता येऊ शकते.
रुग्ण श्री. नमन कुमार म्हणाले,हे सर्व काही काही क्षणात घडले असून सुरुवातीला मला ही साधी जखम वाटली होती. मात्र नंतर पायातील महत्त्वाच्या संरचनांचे गंभीर नुकसान झाल्याचे समजल्यानंतर मी आणि माझे कुटुंब खूप घाबरलो होतो. मी पुन्हा कधी नीट चालू शकेन का याची भीती वाटत होती. आता मी बरा होत आहे आणि लवकरच कोणत्याही आधाराशिवाय चालण्याची आशा आहे. डॉ. अतीव सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो.
मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबईचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले,गंभीर दुखापतींच्या रुग्णांमध्ये जलद निदान, अत्याधुनिक शस्त्रक्रिया कौशल्य आणि विविध विभागांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये आम्ही रुग्णांचे अवयव वाचवण्याबरोबरच त्यांचे कार्यक्षम जीवन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले,* ही घटना गंभीर दुखापतीनंतर त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते. वेळीच उपचार केल्यास कायमस्वरूपी अपंगत्व टाळणे शक्य आहे.