पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः बँकिंग उद्योगातील अग्रगण्य असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडेरेशन, मुंबई युनिटच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बँक खाजगीकरण विरोधात बँक कर्मचार्यांनी सह्यांची मोहीम सुरु करून बँक राष्ट्रीयकरण बाबत जनजागृती सुरु केली.
या प्रसंगी सर्व बँक कर्मचारी महात्मा गांधी पुतळ्या जवळ पनवेल महानगरपालिका येथे जमले होते. सर्व प्रथम संघटनेच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला संघटनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून सर्व जमलेल्या बँक कर्मचार्यांनी अभिवादन केले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी अरविंद मोरे म्हणाले की, मोठ्या कष्टाने ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात खूप महत्वाची भूमिका अदा केली होती. आज बँक राष्ट्रीयकरण होऊन 52 वर्ष झालीत. ह्या 52 वर्षात देशातील सर्वसामान्यांच्या प्रगती पासून तर उद्योगांची सुद्धा प्रगती झाली.
बँक राष्ट्रीयीकरणामुळे देश समृद्ध झाला, प्रगतीपथावर आजही आहे. सर्वसामान्यांना बँकिंगचा अधिकार मिळाला. छोट्या उद्योगापासून तर मोठ्या उद्योगपर्यंत बँकांतर्फे कर्जपुरवठा करण्यात आला. जनधनची शून्य शिल्लकीने बचत खाती 97% उघडली. अटल पेन्शन योजनेची 98% खाती उघडली. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेची 98% खाती उघडली. किसान क्रेडिट कार्डची 95% खाती उघडली. पीक विमा योजनेत 95% राष्ट्रीयकृत बँकांचा सहभाग राहिला आहे. गरीब शेतकर्यांना देण्यात येणारी मदत गरीब किसान कल्याण निधी योजनेत सहभाग 95% आहे. फेरीवाल्यांसाठीच्या कर्जवाटपात स्वनिधीत वाटा 98% आहे. कोरोनाच्या काळात छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना तातडीची मदत म्हणून वाटलेल्या कर्जत 90% वाटा राहिला आहे. शैक्षणिक कर्ज योजनेत 80% वाटा आहे. याचाच अर्थ जिथे जिथे सामान्य माणसाला आधार देण्याचा प्रश्न आहे तेथे तेथे सार्वजनिक क्षेत्रातील बँका पुढे आहते. अश्या या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण केले गेले तर ह्या सर्व सुविधांना मुकण्याची दाट शक्यता वाटते. आजच्या दिनाचे औचित्य साधून संघटना बँकांचे खाजगीकरण होऊन नये म्हणून सह्यांची माहीम राबविणार आहे. हे निवेदन मा. प्रधानमंत्री जी व मा. लोकसभा स्पीकर याना सुपूर्द करणार आहे. संघटनेच्या वतीने अरविंद मोरे यांनी जास्तीत जास्त लोकांनी ह्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांना संघटने तर्फे पत्रके वाटून निवेदनावर सह्या सुद्धा घेण्यात आल्या. संघटनेच्या ह्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अस्मिता गुणे, कमलेश सराफ, आकाश शिरवय्या, विजयकुमार पाटील, सुनेत्रा परांजपे, वीरेंद्रकुमार श्रीवास्तव, संतोष उगले, वामनराव गायकवाड, उदय कांबळे, कमलिनी महाजनी आदी बँक कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ः सह्यांची मोहिम