या विशेष उपक्रमांतर्गत एकूण पंच्याहत्तर अभंगांचे ध्वनीमुद्रण व व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येत आहे. रेकॉर्डिंग प्रसंगी भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा समाजाला अर्पण केला जात आहे. हे अभंग केवळ एका वर्षापुरते मर्यादित नसून, पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अभंगांची रचना व सादरीकरण विविध अनवट आणि पारंपरिक रागांवर आधारित चालींमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे नवोदित विद्यार्थी, शिष्यवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध व सुसूत्र ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील रागसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.सदर उपक्रमामुळे भक्ती, संगीत आणि संस्कार यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे. अभंगांच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होऊन नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. लवकरच हे सर्व अभंग सर्व रसिक श्रोत्यांसाठी खुले करण्यात येणार असून, त्यांचे अधिकृत प्रकाशनही लवकरच करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अमृत महोत्सव वर्षाला आणखी एक सांस्कृतिक व आध्यात्मिक अधोरेखा लाभली आहे.