पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई विरोधात महाविकास आघाडीचा सिडकोवर आक्रोश मोर्चा ....
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई विरोधात महाविकास आघाडीचा सिडकोवर आक्रोश मोर्चा ....

पनवेल वैभव / दि.३० (वार्ताहर) : नवीन पनवेल शहरात दिवाळीच्या ऐन सणासुदीच्या काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दररोजच्या आवश्यक गरजांसाठी पाणी मिळणे कठीण झाले असून सिडको प्रशासन मात्र चाल ढकलच करत राहिलं आहे. शहरातील टाक्या कोरड्या पडल्या, नळ कोरडे आहेत आणि नागरिक रात्रभर पाण्यासाठी वणवण करत आहेत, तरीही सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मजेत दिवाळी साजरी करत बसले, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी अनेकदा लेखी पत्रव्यवहार, मागण्या आणि बैठका घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सिडको प्रशासनाने त्यावर गांभीर्याने काहीच कार्यवाही केली नाही. परिणामी नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होत आज शिवा कॉम्प्लेक्सपासून सिडको पाणीपुरवठा विभाग,पनवेल येथे महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 
या मोर्चात महाविकास आघाडीचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे हरेश केणी, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, मनसे प्रवक्ता योगेश चिले, बबन विश्वकर्मा,  महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख गुरु म्हात्रे, शहर प्रमुख रामदास गोवारी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, शेकाप नेते काशिनाथ, नारायण घरत, महिला आघाडी शहर संघटिका सौ. मालती पिंगळा, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, यांच्यासह पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना , युवती सेना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी  झाले होते.
मोठ्या संख्येने नागरिक, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. “सिडको प्रशासन जागे व्हा! पाणी द्या नाहीतर खुर्ची सोडा! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान सिडकोच्या अधिकाऱ्यांशी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता, अखेर अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी उद्यापासून पाणीपुरवठा नियमित करण्याचं आश्वासन दिलं.महाविकास आघाडीने स्पष्ट इशारा दिला की, जर पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला, तर पुढील वेळी आम्ही केवळ मोर्चा नव्हे तर सिडको प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र आंदोलन उभारू.सिडकोच्या ढकल-ढकल धोरणामुळे निर्माण झालेल्या या पाणीबाणीने प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघडकीस आणली आहे.
फोटो : मोर्चा
Comments