श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या ६१९ बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया...
गेल्या पाच वर्षांत श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या ६१९ बालरुग्णांवर  यशस्वी शस्त्रक्रिया
 
 रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने हृदयविकाराने त्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उभारला १० कोटी रुपयांचा निधी
 
मुंबई / (पनवेल वैभव ) - : नवी मुंबईतील खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करून जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त सुमारे ६१९ बालरुग्णांना नवे आयुष्य मिळाले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली 'गिफ्ट ऑफ लाईफ' प्रकल्पांतर्गत तसेच प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. जमा झालेल्या पैशातून ६१९ बालरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
 
या बालरुग्णांना मिळालेल्या नव्या आयुष्याचा आनंद साजरा करण्यासाठी, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रुग्णालयतील बालरुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
हृदयविकार असलेल्या बालरुग्णांवर शस्त्रक्रिया ही एक आव्हानात्मक व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हृदयातील छिद्रे, ऱ्हदयाच्या झडपांसंबंधीत समस्या किंवा असामान्य रक्तवाहिन्या यासारख्या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. यावर वेळीच उपचार न केल्यास दम लागणे, मुलांची वाढ खुंटणे, वारंवार संसर्ग होणे आणि अकाली मृत्यू यासारख्या गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. दरवर्षी, भारतात २ लाखांहून अधिक मुलं जन्मजात हृदयविकारांसह जन्माला येतात आणि सुमारे ७०,००० मुलांना जन्मल्यानंतर वर्षभरातच शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. मात्र आर्थिक अडचणी आणि जागरूकतेच्या अभावामुळे, अनेक मुलांना वेळीच उपचार मिळत नाही.
 
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि गिफ्ट ऑफ लाईफ प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता सांगतात की, प्रत्येक मुलाला निरोगी हृदयासह जगण्याची संधी मिळायला हवी. आपल्या देशातील अशी अनेक मुलं आहेत जी कोणत्या ना कोणत्या ऱ्हदयविकाराशी झुंजत आहेत असून त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांना या आजाराशी शेवटच्या श्वासापर्यंत लढावे लागते. 'गिफ्ट ऑफ लाईफ' उपक्रमाद्वारे, अशा बालरुग्णांपर्यंत पोहोचण्याता प्रयत्न करत आहोत. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा मी एका मुलाला हसताना पाहतो तेव्हा मला कळते की आम्ही त्यांना उपचाराबरोबरच नव्या आयुष्याची भेट दिली आहे. हे दान नसून हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. मी या मोहिमेचा भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो.
 
श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार आणि बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभात रश्मी सांगतात की, हृदयविकाराने जन्माला येणारे बाळ अनेकदा कमकुवत दिसतात, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, ते पुरेसा आहार घेऊ शकत नाही किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची त्वचा निळसर पडते. जन्मजात हृदयविकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात जीवघेण्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. काही बाळांना जन्मानंतर काही आठवडे किंवा काही महिन्यांत शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. या सगळ्या नाजूक, गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. परंतु यामुळे त्या बाळाचे आयुष्य वाचविता येते. वेळीच निदान, जन्मानंतर केले जाणारे स्क्रीनिंग किंवा इकोकार्डियोग्राम तपासण्या यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जितक्या लवकर या आजाराचे निदान होते तितकीच जगण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते.
 
वेळीच उपचार केल्यास केवळ गुंतागुंत टाळता येत नाही तर मुलाला इतर कोणत्याही बाळाप्रमाणेच निरोगी आणि सक्रिय राहता येते व जगण्याची दुसरी संधी मिळते. शस्त्रक्रियेस विलंब झाल्यास हृदयविकार, विकास खुंटणे तसेच मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच याबाबत पुरेशी  जागरूकता, नियमित तपासणी आणि दर्जेदार उपचारांची उपलब्धता गरजेची आहे.
 
या समारंभात सहभागी झालेले दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगतात की, या धाडसी मुलांना भेटणे खरोखरच हृदयस्पर्शी होते. त्यांचे धाडस आणि रुग्णालय आणि रोटरी क्लबद्वारे केली जाणारे निःस्वार्थ मदत खरेखरच प्रेरणादायी आहे. वेळीच उपचाराने एखाद्याचे अमुल्य जीवन वाचविता येते याची प्रचिती याठिकाणी आली.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image